कासवांचे गाव




पहाटेची शांत वेळ... समुद्रावरचा थंडगार खारा वारा अंगाला बोचत होता. समुद्राच्या लाटांची गाज आसमंतात भरुन राहिली होती. अजून पुरेसे उजाडले नव्हते तरी समुद्रावर हळूहळू माणसं गोळा होऊ लागली होती. माणसं म्हणजे लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत सगळीच होती. वेगवेगळ्या प्रांतातून , प्रदेशातून आलेली माणसं ती, काही तर परदेशातून पण आली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उत्सुकता दाटून राहिली होती. किनाऱ्यावर उभारलेल्या खोपटामध्ये दहा-बारा टोपल्या गोणपाट घालून झाकून ठेवल्या होत्या. त्याच्या भोवती जाळीचे कुंपण उभारले होते. त्याच्या आजूबाजूला माणसे कोंडाळे करुन आपपल्या जागा आडवून बसून राहिली होती. तेवढ्यात गावातले कार्यकर्ते लगबगीने आले आणि तडक खोपटात शिरले. तेथे झाकलेल्या टोपल्या ते एक एक करुन उघडून पाहू लागले... खोपटाबाहेरच्या माणसांची उत्कंठा शिगेला पोचली होती. टोपल्यांखाली नेमके दडले तरी काय होते ? शे-दोनशे माणसं भल्या पहाटे किनाऱ्यावर कशाल जमली होती ? दोन टोपल्या उघडल्या तरी पदरी निराशाच पडली... तिसरी टोपली उघडली आणि खोपटाबाहेरच्या माणसांचा एकच गलका उडाला. तिसऱ्या टोपलीखालून इवली इवलीशी पाऊले बाहेर पडली, नुकत्याच उघडलेल्या डोळ्यांनी पहिल्यांदाच या जगाचे दर्शन घेतले होते. बाहेर पडल्या पडल्या त्या पिल्लांना आस लागली होती ती समद्राची... नैसर्गिक प्रेरणेने अंड्यातून बाहेर पडल्याच्या काही क्षणात ती पिल्ले समुद्राकडे सरकू लागली.
भल्या पहाटे ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांचा तो जन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी जमलेल्या त्या गर्दीचे कष्ट सार्थकी लागले होते. काही महिन्यांपुर्वी या किनाऱ्यावर येऊन अंडी घालून या पिल्लांची आई समुद्रात निघुन गेली होती. कधीच न परतण्यासाठी... आता पुढचा संघर्ष पिल्लांना स्वतः करायचा होता. आज अंड्यातून बाहेर पडून ती पिल्ले बाहेर पडली होती. जीवनचक्रातला एक टप्पा पुर्ण झाला होता.
ही पिल्ले होती ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या कासवाची आणि हा सोहळा रंगला होता ते ठिकाण होते रत्नागिरीतील वेळास !
वेळास... रत्नागिरी जिल्ह्याची सुरवात होते तिथले पहिले गाव !
हरिहरेश्‍वराच्या सान्निध्यात असलेले आणि बाणकोट जवळून वाहणाऱ्या सावित्री नदीच्या खाडीच्या दक्षिण तीरावर वसलेले हे गाव तसे आडवाटेवरचे. बाणकोटच्या खाडीवरुन जोपर्यंत फेरीबोट सेवा सुरु झाली नव्हती, तोपर्यंत कोकणाच्या या भागात येऊनही या बाजूला फारसे कोणी फिरकत नसे.
विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेले आडवाटेवरचे हे गाव काही दशकांपुर्वी फारसे कोणाच्या खिजगणतीतही नव्हते. नाही म्हणायला गावाला ऐतिहासिक वारसा मोठा आहे. याच गावात राहणाऱ्या "भानू' आडनावाच्या कुटुंबातील एकाने देशावर जाऊन स्वतःच्या बुध्दीच्या बळावर इंग्रजांनाही सळो कि पळो करुन सोडले. ते प्रसिध्द व्यक्तिमत्व म्हणजे पेशवाईतील साडेतीन शहाण्यांमधील एक नाना फडणवीस ! वेळास गावातला त्यांचा स्मारकवजा पुतळा एवढीच काय ती त्यांची आठवण आज वेळास गावात शिल्लक आहे.
गेल्या दशकभरापासून वेळास जगाच्या नकाशावर येत आहे ते तिथे येणाऱ्या कासवांमुळे !
फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात इथला समुद्रकिनारा हा माणसांनी गजबजून जातो. बाकी वर्षभर हा नितांत सुंदर किनारा हा ओस पडलेला असतो. पण मग या हंगामात येथे गर्दी का होत असावी ? याचे कारण या किनाऱ्यावर येणारी कासवे आहेत. वेळासच्या समुद्र किनाऱ्यावर पुर्वीपासून विणीच्या हंगामात कासवाची माद्या अंडी घालायला दरवर्षी येतात. निसर्गचक्रानुसार ही प्रक्रिया वर्षानुवर्षे अव्याहत सुरु आहे. वेळासच नाही तर इथुन खाली दक्षिणेकडे हर्णे, केळशी,सालदुरे, अंजर्ले, कोळथरे, आडे, लाडघर, गुहागर, वेळणेश्‍वर, गावखडी, वेत्ये, मालगुंड, मुणगे, मालवण, वेंगुर्लेपर्यंतच्या संपुर्ण कोकण किनारपट्टीवर दरवर्षी या कासवाच्या माद्या येत असतं आणि अंडी घालून पुन्हा समुद्रात निघुन जातात.
पण आज केवळ वेळासला या कासवांचे हमखास दर्शन होते, इतर ठिकाणांचा पर्यटन स्थळं म्हणून विकास झाल्यामुळे कासवं त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला कायमची मुकली. आपले पर्यटन, आपण ठरवलेल्या विकासाची व्याख्या कासवांच्या मुळावर उठल्या हे खरं !
दशकभरापुर्वी ही कासवं आणि त्यांची घरटी याबद्दल फारशी माहिती कोणाला नव्हती. काही स्थानिक गावकऱ्यांना ही 'कासवांची गोष्ट' माहिती होती. किनाऱ्यावर फिरताना अधेमधे ही कासवं त्यांना दिसायची. या कासवांच्या किनाऱ्यावर जाण्यायेण्याचा वेळा त्यांना अचूत माहिती होत्या, पण त्याला फारसे महत्व कधी दिले नाही. कासवांचे महत्व काय ? त्यांचे संरक्षण आणि संवर्धन कशासाठी करायला हवे याबाबतची पुरेशी जाण त्यांना नव्हती.
गावातल्याच लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील काही लोकं विणीच्या हंगामात कासवांवर नजर ठेवुन असत. कासवांच्या वेळेनुसार त्यांनी घातलेली अंडी पळवुन नेत. कासवांचा खाण्यासाठी वापर या भागात सर्रास केला जात असे. मानवी शिकारांच्या तावडीतून सुटलेली अंडी आणि कासवे नंतर अन्नसाखळतील इतर घटकांच्या (कोल्हे, कुत्रे, समुद्री पक्षी) तावडीत सापडत. त्यांच्याही ताब्यातून जी काही नशीबवान पिल्ले अंड्यातून सुखरुप बाहेर येऊन पाण्यापर्यंत पोचत त्यांच्यामधल्या दीर्घायुषी होण्याचे भाग्य हजारामधील एखाद्याच पिल्लाला मिळत असे. या कासवांचा जगण्यासाठीचा संघर्ष हा अफाट आहे.
 
"सह्याद्री नेचर कन्झ्रेवेशन'ने रोवली मुहुर्तमेढ
वेळासचा किनारा हा कासवांच्या प्रजननाचे नैसर्गिक केंद्र आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कासवे प्रजाननासाठी नियमीतपणे येतात याची सर्वप्रथम नोंद घेतली ती चिपळूणच्या "सह्याद्री नेचर कन्झ्रेवेशन' या संस्थेने. वर्ष 2002 पासून "सह्याद्री नेचर कन्झ्रेवेशन' संस्थेने या कासवांच्या संवर्धनासाठी संघटित स्वरुपात आणि शास्त्रीय पध्दतीने काम सुरु केले. या संस्थेचे कार्यकर्ते, वेळासचे गावकरी आणि वन खात्याचे अधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून वेळास कासव संवर्धनाचा कार्यक्रम सुरु झाला. सुमारे दहा-अकरा वर्ष संवर्धनाचे काम केल्यानंतर ही जबाबदारी "सह्याद्री नेचर कन्झ्रेवेशन'ने वेळासच्या ग्रामस्थांकडे सोपवली.
आज वेळास गावात ग्रामपंचायत , वन्य संवर्धन समिती आणि निर्मल सागर तट या तीन संस्था एकत्र मिळून कासव संवर्धनाचे काम करतात. पाच वर्षापुर्वी "सह्याद्री नेचर कन्झ्रेवेशन'ने आपले काम वेळासच्या ग्रामस्थांकडे सोपवले. तेव्हापासून कासवांचे संरक्षणाचे आणि त्यांची घरटी आणि अंडी सांभाळण्याचे काम वेळासचे गावकरी करतात. "सह्याद्री नेचर कन्झ्रेवेशन'चे सुरवातीपासूनचे कार्यकर्ते आणि वेळास गावचेच रहिवासी मोहन उपाध्ये आणि त्यांचे सहकारी हे काम करत होते. मात्र गेल्या दोन वर्षापासून मोहन उपाध्ये यांनी आंजर्ले गावात कासवांच्या संवर्धनाचे काम सुरु केले आहे आणि तिथे त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. आंजर्ले गावातही आता कासवांबाबत जागृती वाढत आहे. गेल्या दोन वर्षांपासून वेळास गावात हेमंत सालदूरकर आणि इतर ग्रामस्थ संवर्धनाची धुरा वाहत आहेत.




संवर्धनाचे किचकट काम

साधारणतः नोव्हेंबर ते मार्च हा काळ या कासवांच्या प्रजननाचा काळ असतो. या काळात कासवाची मादी समुद्र किनाऱ्यावर येते. बहुतेक वेळेला ही मादी मध्यरात्री किनाऱ्यावर येते. भरतीची वेळ या कासवांना सोयीची असते. भरती ओहोटीची गणिते जुळवुनच या माद्या किनाऱ्यावर येतात. किनाऱ्यावर आल्यानंतर पाण्यापासून अंदाजे पन्नास ते ऐंशी मीटर अंतरावर सुमारे दीड ते अडीच फूट खोल खड्डा करुन मादी अंडी घालते. एका वेळी साधारणतः 80 ते 170 अंडी मादीकडून घातली जातात. या खड्डयावर पुन्हा आपल्या वल्ह्यासारख्या पायांनी रेती लोटून ही मादी पुन्हा समुद्रात निघून जाते कधीही न परतण्यासाठी... यानंतर अंड्यातून बाहेर येणाऱ्या पिल्लांना त्यांची जन्मदाती आयुष्यात कधीच भेटत नाही. अंडी घालून कासवे समुद्रात परत जाताना रेतीवर एक वैशिष्ट्यपुर्ण नक्षी रेखाटून जातात. त्यांचे वल्ह्यासारखे पाय आणि शेपटी यामुळे किनाऱ्यावर एक विशिष्ट प्रकारची नक्षी तयार होते. या माद्या अंडी घालून समुद्रात परत गेल्या की कासवांच्या संवर्धनाचे काम सुरु होते. नोव्हेंबर ते मार्च या काळात दररोज पहाटे संवर्धनाचे काम करणारे कार्यकर्ते किनाऱ्यावर येतात. रात्री कासवानी घरटे करुन अंडी घातली की दोन ते तीन तासाच्या कालावधीतच ही घरटी शोधून त्यामधील अंडी ही सुरक्षित ठिकाणी हलवावी लागतात. कासवांनी किनाऱ्यावर केलेल्या एक विशिष्ट प्रकारच्या नक्षीचा माग काढत ही घरटी शोधावी लागतात. घरटे सापडल्यानंतर त्या घरट्याचा आकार, त्यांची खोली, लांबी याच्या सविस्तर नोंदी घेतल्या जातात. त्यानंतर त्या घरट्यातल्या अंड्याची नोंद केली जाते. नंतर ही अंडी हलक्‍या हाताने कासव संवर्धन केंद्रात आणली जातात. तिथे पुन्हा तेवढ्याचा खोलीचा खड्डा करुन त्यात ही अंडी व्यवस्थित पुरली जातात. अंडी पुरल्यानंतर त्या खड्यावर घरटे सापडले तो दिवस आणि तारीख लिहीली जाते. तसेच अंदाजे अंड्यातून पिल्ले कधी बाहेर येतील याचा दिनांकही लिहीला जातो. ही प्रक्रिया केवळ एका घरट्यासाठी झाली. कासवाची जेव्हा अंडी घालते तेव्हा ती त्या अंड्याभोवताली एक विशिष्ट प्रकारच्या स्त्राव त्या घरट्यात आणि रेतीत सोडत असते. त्या स्त्रावामुळे अंड्यांचे बुरशीपासून रक्षण होते. त्यामुळे अंडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवताना मुळ घरट्यातील हा स्त्रावमिश्रीत मातीही हलवावी लागते. जेणेकरुन अंड्याना नैसर्गिक संरक्षण मिळतेय




चार महिने हा कार्यकत्यांचे हे काम अव्याहतपणे चालू राहते. यावेळेस वेळासला मार्चअखेरीपर्यंत वीस घरटी सापडली आहेत. हजार बाराशे अंडी सापडली आहेत.
हे सगळे झाल्यानंतर प्रतिक्षा सुरु होते ती या पिल्ल्यांच्या जन्मोत्सवाची....
-------------------------------------
कासवांची भूमिका
खोल समुद्रात राहणाऱ्या या कासवांची निसर्गचक्रात नक्की काय भूमिका असते तर गिधाडे आणि तरसासारखे प्राणी स्वच्छतेचे जे काम जमिनीवर करतात तेच काम कासवे पाण्यात करतात.
मेलेले जलचर, अमर्याद वाढलेल्या पाणवनस्पती खाऊन ही कासवे सागरतळ स्वच्छ ठेवण्याचे अत्यंत महत्वाचे काम करतात. समुद्रात सापडणारी जेली फिश हे कासवांचे आवडते खाद्य आहे. ही कासवे त्यांच्या अन्नासाठी मनुष्य किंवा इतर जलचरांशी कोणतीही स्पर्धा करत नाहीत त्यामुळे त्यांचा कोणाशीही संघर्ष होत नाही.
----------------------------------------
ऑलिव्ह रिडले कासवांची सर्वसाधारण माहिती
या कासवाचे शास्त्रीय नाव Lepidochelys Olivacea हे आहे. या प्रजातीच्या कासवाची सरासरी वयोमर्यादा पन्नास वर्ष इतकी असते. नराचे वजन 40 किलोपर्यंत तर मादीचे वजन 45 किलोपर्यंत असते. या प्रजातीमध्ये मादी ही नरापेक्षा आकाराने मोठी असते. या कासवांची सरासरी लांबी 2 फूट असते. विणीच्या हंगामात मादी 80 ते 170 अंडी एकावेळेस घालते. ही अंडी उबण्याचा कालावधी 45 ते 55 दिवसांचा असतो. नवजात पिल्लाचे वजन 15 ते 25 ग्रॅम इतके असते. नोव्हेंबर ते मार्च हा या कासवांचा विणीचा हंगाम असतो.

कासव
भारतीय समुद्र किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक बिल, लॉगर हेड या चार प्रकारची कासवे आढळून येतात. यापैकी कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे आढळून येतात. या भागातील उष्ण समशीतोष्ण हवामान या कासवांना मानवते तसेच हे हवामान प्रजाननासाठी अनुकुल मानले जाते. ही कासवे वयात आल्यानंतर दर दोन ते तीन वर्षांनी अंडे घालतात. ही अंडी घालण्यासाठी त्यांना किनाऱ्यावर यावे लागते. याव्यतिरिक्त या कासवांचे पुर्ण आयुष्य समुद्रात जाते. समुद्रात ज्या भागात कासवे वास्तव्य करतात ती जागा आणि अंडी घालतात यामध्ये काही हजार किलोमीटर अंतर असते असे टॅग लावलेल्या कासवांच्या अभ्यासातून सिध्द झाले आहे. तसेच या कासवांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी या कासवांचा जन्म होतो त्याच ठिकाणी ही कासवे अंडी घालण्यासाठी परततात.


वेळस , कासवे आणि राजकारण
कासवांमुळे वेळास गावाचे नाव हे जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले असले तरी दरवर्षी इथे भरणाऱ्या कासव महोत्सवाला इथल्या स्थानिक राजकारणाची एक वेगळी किनार आहे. कासवांसाठी वेळास गावात जे पूर्वी काम करणारे आणि सध्या काम करणारे असे दोन तट]असून यांच्यामध्ये जोरदार शीतयुद्ध सुरु असते. गेली १० वर्षे कासवांसाठी काम करणारा वर्गावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत. गावात गेलं आणि याबद्दल विचारला तर लगेच कोणी बोलायला तयार होत नाही. ज्या group ला गावात काम करण्यासाठी अटकाव करण्यात आला आहे हा ग्रुप आता दुसऱ्या गावात कासव संवर्धनसाठी प्रयत्न करत आहे. मात्र सोशल माध्यमांच्या मदतीने हाच group वेळास गावात्तील कासव महोत्सवाची यथेच्छ टीका टिंगलटवाळी करत असतो. एका चांगल्या उपक्रमाला या असा प्रकारांमुळे गालबोट नक्कीच लागत आहे.
पर्यटकांचा धूडगुस कासवांच्या जीवावर ?
आपल्याकडे पर्यटनाचे जे नवे `फ्याड` म्हणून रुजत आहे त्याची झळ `कास पुष्पोत्सव`, `काजवा महोत्सव` 'हरिश्चंद्रगडावरील अतिगर्दी' येथे आपण अनुभवला आहेच, वेळास चा कासव महोत्सव हळूहळू याच श्रेणीत जाऊ पहात आहे. सकाळ संध्याकाळ येथ येणारे पर्यटक कासव बघण्यासाठी नक्कीच उत्सुक असतात पण आयोजकांची तुटपुंजी संख्या आणि ढिसाळ नियोजन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. पिल्ले समुद्रात सोडत असताना ती बघण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडते, चेंगराचेंगरी होते यात काहीवेळा कासवांची पिल्ले जखमी होण्याची देखील प्रकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून उघड झाले आहेत...
-------------------------------------------
पूर्व प्रकाशित : सकाळ साप्ताहिक एप्रिल २०१८
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

मेंगाईसोबतची रात्र

The Neighbour Side -- Visit to Pakistan High Commission