आडवाटेवरच्या मंगळगडाचे दुर्गशिल्प
निसर्गने जे चित्र उलगडून ठेवले ते केवळ अवर्णनीय होते!! घाटातून वर चढणारे ढगांचे लोट, आजूबाजूची निरव शांतता, पाठीमागे त्या छोट्या दुकानांमधून सांडणारा बल्बचा पिवळसर मंद्सार प्रकाश आणि आमच्या पाठीमागे असणाऱ्या त्य प्रकाशामुळे त्य ढगांवर आमच्या सावल्या उमटल्या होत्या. ढग जसे लांब जात होते तसे तश्या आकृत्या मोठ्या होत जात अखेरीस आसमंतात विरून जात होत्या. ढगांच्या त्या पडद्यावर चालणारा तो चित्र सावल्यांचा खेळ संपला तो मागचा दिवा मालवल्यावारच !! क्षणात घाटात अंधार पसरला आणि आणि मग आम्ही त्यात बुडून गेलो. तिथून हलावेसे वाटत नव्हते . मात्र निघणे भाग होते, पुढे काय रस्त्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नव्हती.
शिवस्पर्शाने पावन झालेल्या गडांना आज इतिहासात मानाचे स्थान आहेच, पण याव्यतिरिक्त असेही अनेक गड-किल्ले अज्ञात इतिहासाच्या खुणा आपल्या अंगाखांद्यावर घेऊन उभे आहेत. भले या किल्ल्यांना इतिहासात शिवरायांचा सहवास लाभला नसेल, मात्र त्यांचा इतिहासही तितकाच अस्सल, रोमांचक व महत्त्वाचा आहे. अशाच एका आडवाटेवरच्या किल्ल्याची भ्रमंती... ![]() |
वरंधा घाटाकडे जातानाची हिर्डोशीची खिंड, |
पा वसाळा सुरू झाला, की डोंगर भ्रमंतीचे वेध लागतात. हिरव्या पायवाटा खुणावू लागतात. पुण्या-मुंबईच्या जवळपास एका दिवसात जाता येतील असे बरेच प्रसिद्ध किल्ले आहेत. राजगड, तोरणा, पुरंदर, राजमाची, तुंग, तिकोना, शिवनेरी, लोहगड हे किल्ले आता सर्वांनाच माहिती आहेत. शनिवार - रविवार इथे प्रचंड गर्दी उसळलेली असते. हजार-दोन हजार लोक गडावर असतात. ट्रेकिंगच्या नावाखाली निसर्गाला मनसोक्त ओरबाडण्याचे काम बिनधास्त सुरू असते. मागच्याच आठवड्यात सिंहगडावरील पर्यटकांचा आकडा दहा हजार नोंदला गेला होता.
जातिवंत भटक्याला अशा ठिकाणी गुदमरायला होते. ज्या कारणासाठी दुर्गभटकंती करायची, जी शांतता अनुभवायची, स्वतःशी संवाद साधायचा, शिवरायांच्या इतिहासाची उजळणी करायची हे सगळे उद्देशच या गर्दीत, कोलाहलात हरवून जातात. अशा वेळेला लाडक्या सह्याद्रीच्या आडवाटेवरची ही दुर्गशिल्पे आपल्याला खुणावत असतात. आपण फक्त त्यांच्या हाकेला प्रतिसाद द्यायचा आणि पावसाळ्यातल्या सौंदर्याची मनमुराद लयलूट करायची.
कदाचित राजगड किंवा रायगडासारखा समृद्ध ऐतिहासिक वारसा या अपरिचित किल्ल्यांना लाभला नसेल, शिवकालीन वास्तू किंवा स्थापत्यशास्त्राच्या सुंदर इमारती इथे उभ्या नसतील; तरीसुद्धा सह्याद्रीकडून मिळालेले जन्मजात रांगडेपण हे किल्ले बेलगामपणे मिरवत उभे असतात. त्यांच्या बिकट वाटांवरचा थरार अनुभवण्यासाठी तरी या किल्ल्यांवर अवश्य जावे.
![]() |
वरंधा घाटातून सह्याद्रीच्या घाटांचे दिसणारे विहंगम दृश्य आणि असरलेली घनदाट अरण्ये !!! |
असेच एक दुर्गशिल्प वरंधा घाटाच्याखाली आहे. कांगोरी ऊर्फ मंगळगड नावाचा देखणा किल्ला शतकानुशतके एकटाच उभा आहे. याच्या वाटेला फारसे कोणी जात नसल्याने या वाटा मळलेल्या नाहीत; उलट काळाच्या ओघात त्या बुजतच चालल्या आहेत. अजून काही वर्षांत या वाटा पूर्णपणे पुसल्या जातील आणि हळूहळू यासारखे एक - एक दुर्गरत्न काळाच्या उदरात गडप होत जाईल.
सह्याद्रीची पर्वतरांग ही दक्षिणोत्तर पसरली आहे आणि या रांगेला अनेक ठिकाणी पूर्व-पश्चिम फाटे फुटले आहेत. सह्याद्रीच्या अशाच एका पूर्व-पश्चिम फाट्यावर हा मंगळगड उभा आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची अंदाजे 2489 फूट आहे. जावळीचे चंद्रराव मोरे यांनी बांधलेला हा किल्ला, शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये रायरी ताब्यात घेतल्यानंतर स्वराज्यात सामील झाला. हा किल्ला "कांगोरी' किंवा "कांगोरीगड' या नावाने स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहे. जावळीच्या जंगलात उभा असल्याने या किल्ल्याला जंगलाचे नैसर्गिक कवच मिळाले आहे. हे जंगल या किल्ल्याच्या दुर्गमतेत भर घालते. मंगळगड हा रायगडाच्या घेऱ्यात असल्याने शिवकाळात याचा उपयोग पहाऱ्याचे किंवा टेहळणीचे ठाणे म्हणून होत असे. अठराव्या शतकात काही इंग्रज अधिकाऱ्यांना मंगळगडावरच्या तुरुंगाची हवा चाखायला मिळाली होती. त्याआधी शिवकाळातसुद्धा कैद्यांना ठेवण्यासाठी मंगळगडाचा वापर केल्याचे उल्लेख इतिहासात आहेत. 1818 मध्ये हा गड इंग्रजांनी जिंकून घेतला आणि या किल्ल्याचा एकांतवास सुरू झाला. प्रतापगड, मकरंदगड, चंद्रगड, वासोटा हे या किल्ल्याचे जोडीदार जावळीच्या खोऱ्यात अलीकडे पलीकडे पसरले आहेत. रायरेश्वराजवळची अस्वल खिंड, कावळ्या किल्ल्याजवळचा वरंधा घाट या प्राचीन घाटवाटांवर लक्ष ठेवण्याचे काम मंगळगड करत असे.
![]() |
पहिला चढ चढून आल्यावर पठारावरून दिसणारा मंगळगड उर्फ कांगोरी |
या रस्त्याच्या सुरवातीलाच उजव्या हाताला एक चर खोदला आहे आणि त्यावर पलीकडे जाण्यासाठी बांबूची शिडी आडवी टाकली आहे. ही शिडी सुरवातीलाच पार करून पलीकडे जावे. पलीकडे गेल्यावर ही वाट जंगलात शिरते आणि चढाईचा भाग लागतो. सुरवातीचा हा चढ चांगलीच दमछाक करतो. चढ चढून गेलं की आपण पठारावर पोचतो. या पठारावरून सरळ नाकासमोर मंगळगडाचा बालेकिल्ला दिसतो. नाकासमोरची ही वाट धरून सरळ पुढे चढत जावे. हा चढ तीव्र नसला, तरी सलग असल्यामुळे दमायला होते. हा चढ सरळ आपल्याला किल्ल्याच्या महादरवाजापाशी घेऊन जातो. आजमितीला गडाचा मुख्य दरवाजा अस्तित्वात नाही, तरी मोडकळीस आलेल्या पायऱ्या आणि बुरजांची जागा यामुळे या दरवाजाची कल्पना येऊ शकते. इथे जातानाची वाट चढताना काळजीपूर्वक चढावी, कारण एक तर ही वाट पावसाळ्यात प्रचंड घसरडी आणि भुसभुशीत होते आणि दुसरे कारण म्हणजे इथे आधारासाठी लावलेले कठडे तुटून दरीत पडल्यामुळे एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला कताळभिंत आणि पायाखालची निसरडी वाट अशा खिंडीत तुम्ही अडकता. तेव्हा चढाई करत असताना इथे गडबड, गोंधळ, अतिधाडस टाळावे.
![]() |
किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी दिसणारे तटबंदीचे अवशेष |
![]() |
गडावरील भैरवनाथाचे छप्पर हरवलेले मंदिर |
या मंदिरामागून एक पायवाट मागे उतरते. ती थेट गडाच्या माचीच्या टोकाशी जाते. गडावर राबता एकदम कमी असल्यामुळे, तसेच पावसाळ्यात गवत भरगच्च वाढत असल्यामुळे पायाखालची वाट तपासत शेवटपर्यंत जावे. इथे माचीच्या शेवटाला अर्धवर्तुळाकार बुरूज आहे. इथून जावळीच्या खोऱ्याचे, सह्याद्रीच्या रांगांचे विहंगम व मनोहारी दर्शन घडते.
![]() |
उघड्या आकाशाखाली बसलेल्या भैरवनाथ मंदिरामागून उतरत जाणारी तटबंदी आणि त्याच्यामागे जावळीच्या खोऱ्याचे मनोहारी दृश्य |
इथून परतीच्या वाटेवर येताना पुन्हा किल्ल्याच्या दरवाजापाशी यावे. ज्या वाटेने आपण चढून आलेलो असतो त्याच वाटेने उतरायचे असते. मात्र, तीच वाट उतरताना वेगळी वाटायला लागते. विशेषतः पावसाळ्यात या उतरणीच्या वाटेवरून पाण्याचे ओहोळ वेगाने वाहत असतात. त्यामुळे ही वाट धोकादायकरीत्या घसरडी बनते, प्रसंगी जिवघेणीही ठरू शकते. किल्ल्याच्या वाटेवर, पायऱ्यांवर माती असल्यामुळे घसरून पडण्याचा आणि दुखापतीचा धोका असल्याने इथून उतरताना विशेष काळजी घ्यावी.
किल्ला चढायला साधारणतः दोन तास लागतात. उतरताना दीड तासात तुम्ही पायथ्याच्या पिंपळवाडीत पोचता. किल्ला सबंध फिरायला, बघायला दीड तास पुरतो. वेळेचे नियोजन काटेकोररित्या केले तर पुणे आणि मुंबई दोन्ही ठिकाणाहून हा किल्ला एका दिवसात सहज बघून होतो.
![]() |
मंगळगडाचे मुख्य आकार्षांबिंदू असलेली तटबंदीचा बालेकिल्ल्यावरूनचा नजारा . |
स्वतःचे वाहन असेल, तर सकाळी लवकर निघून एका दिवसात शिवथरघळ आणि मंगळगडाचा बेत सहज होऊ शकतो. वरंधा घाटाच्या खालीच वसलेली समर्थांची शिवथरघळ हे एक अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे. याखेरीज वरंधा घाटात असलेला कावळा किल्ला हादेखील भटकंतीचे एक अपरिचित ठिकाण आहे. मात्र, या किल्ल्याची वाट ढासळल्यामुळे इथे जाताना माहितगाराला सोबत घेऊन जावे.
![]() |
पायथ्याचे गाव पिंपळवाडी. |
इथून परतताना एक सुंदर अनुभव गाठीशी कायम बांधला गेला,. मंगळगडवरुन निघताना थोडा उशीरच झाला होता आणि पाऊस मी म्हणत होता.तसाच पावसाचा मार सोसत आम्ही वरंधा घाटात पोहचायला बरोबर दिवेलागण झाली होती. दिवसभर पोटात काहीही नव्हते आणि वरंधातल्या भजेवाल्यानी त्यांचा कारभार आटोपायला घेतला होता. दादापुता करून पोटभर भज्यांची ऑर्डेर दिली.. हे सगळे होईपर्यंत निसर्गने जे चित्र उलगडून ठेवले ते केवळ अवर्णनीय होते!! घाटातून वर चढणारे ढगांचे लोट, आजूबाजूची निरव शांतता, पाठीमागे त्या छोट्या दुकानांमधून सांडणारा बल्बचा पिवळसर मंद्सार प्रकाश आणि आमच्या पाठीमागे असणाऱ्या त्य प्रकाशामुळे त्य ढगांवर आमच्या सावल्या उमटल्या होत्या. ढग जसे लांब जात होते तसे तश्या आकृत्या मोठ्या होत जात अखेरीस आसमंतात विरून जात होत्या. ढगांच्या त्या पडद्यावर चालणारा तो चित्र सावल्यांचा खेळ संपला तो मागचा दिवा मालवल्यावारच !! क्षणात घाटात अंधार पसरला आणि आणि मग आम्ही त्यात बुडून गेलो. तिथून हलावेसे वाटत नव्हते . मात्र निघणे भाग होते, पुढे काय रस्त्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नव्हती.
तिथून निघाल्यानंतर पाऊस जोरात सुरु झाला होता. मात्र नजर बर्यापैकी रूळल्यामुळे वेग पकडला होता. हिरडोशी गावाच्या अलीकडे आल्यानंतर रस्ता थोडा अरुंद झाला आणि गाडी अचानक घसरू लागली. आधी वाटले कि कदाचित पंक्चर असावे मात्र ते तसे नव्हते. अजून पुढे गेल्यावर घडू नये ते घडलेच आणि मागच्या सकट आम्ही गाडीवरून कधी जमिनीवर अलगद आलो हे कळेपर्यंत आम्ही चिखलात न्हाहून निघालो होतो. धडपडत उभे राहिलो गाडी उचलून जसे काही घडलेच नाही असा अविर्भावात पुन्हा प्रवास सुरु झाला. काही मीटर गेलो नाही तोवर रस्त्यात थोडी गर्दी दिसली. गाडी हळू केली आणि उतरलो तर गाडी पुन्हा सटकली, हि सटकासटकी काही थांबत नव्हती. शेवटी गाडी हातात घेऊन समोरच्या गर्दीपर्यंत पोहोचेपर्यंत तीन चार वेळा अजून गाडी सटकली , गाडीचा सोडा चालता सुद्धा येत नव्हते इतका रस्ता गुळगुळीत झाला होता. गर्दीपाशी गेल्यावर कळले कि या निसरडेपणामुळे एक स्कोर्पिओ आणि एक इंनोवा सुद्धा रस्तासोडून बाजूच्या चिखलात फसल्या होत्या आणि मोठे दोर लावून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न लोक करत होते. झाले असे होते रस्ता रुंदीकरणासाठी जो रस्ता खोडला होता त्यातली माती बाहेर काढून ठेवली होती ती तुफान पावसामुळे रत्यावर पसरून सबंध रस्ताच निसरडा झाला होता. शेवटी पुढचा दीड एक किलोमीटरचा भाग तसाच घसरत घसरत ओलांडला आणि सुटकेचा निश्वास टाकला. भोरला पोहचल्यावर चिखलाने लडबडलेले आमचे वेश बघून आम्हाला कोणी हॉटेलात घेईना !! डोंगर यात्रा करताना कुठली आपत्ती कधी कुठे कशी येऊ शकते याचा मिळालेला तो एक वस्तुपाठच होता.
सहभागी सदस्य : प्रतीक देशपांडे , गौरवी जोशी, कौस्तुभ सहस्त्रबुद्धे
-------------------------------------------------------------------------------
सदर लेख सकाळ साप्ताहिकाच्या 16 जुलै 2016च्या अंकात प्रसिध्द झाला अाहे.
शब्दातीत अनुभव सुद्धा इतका सुंदर मांडला आहेस.
ReplyDeleteShruti Redkar
Deleteधन्यवाद !!!
ReplyDeleteलय भारी
ReplyDeleteलय भारी
ReplyDeleteKhup sundar mandle ahes.. 👌👌kangori la bhet denyachi utsukta vadhli..
ReplyDeletePhotography pan mast..😊
धन्यवाद नम्रता !!
DeleteSundar .Now I can say that you are on the right track.
ReplyDeleteधन्यवाद मामासाहेब
ReplyDeletebhari
ReplyDeleteDhanywad !!!!
DeleteBhaari
ReplyDelete