अंधारबनाचा अंधार

अंधारबनाच्या वाटेवरील कुंडलिकाची अजस्त्र दरी , समोर दुरवर दिसणारा भिरा डॅम
'"अंधारबनला धोका आहे'', 'हा भाग धोकादायक आहे जाऊ नका', असे संदेश सोशल मिडीयावर फिरायला लागले त्यामुळे आपसूकच या जागेबद्दल थोडे कुतूहल निर्माण झाले. हा जागा नक्की का बदनाम होत आहे हे प्रत्यक्ष जाऊन बघण्यासाठी अंधारबनला जाऊन धडकलो. इथे येणारे पर्यटक नक्की काय करतात आणि स्थानिक गावकऱ्यांशी बोलून अंधारबनात नक्की काय धोका आहे हे जाणून घ्यायचा प्राथमिक हेतू होता.
 -----------------------
कुडूगडाच्या ट्रेकसाठी पहाटेच निघून ताम्हिणीच्या मार्गाने मार्गस्थ झालो होतो. डिसेंबरचे दिवस असल्याने हवेत चांगलाच गारठा होता. निवाच्या पुढे पोचल्यानंतर मागून एका गाडीचा हॉर्नमुळे थांबलो. गाडी थांबली, काच्या खाली गेल्या आणि गाडीच एकट्याच बसलेल्या एका विशी बावीशिच्या मुलाने हातातल्या मोबाईलवर गुगल मॅप दाखवत विचारले ये देवकुंड कहा है ? त्याला सांगितले की अजून बरेच लांब जावे लागणार. पूर्ण घाट, विळ्याची midc ओलांडावी लागणार... असे मी वाक्‍य पूर्ण करत असतानाच तो म्हणाला देवकुंड तर इथेच आहे की, लोकेशन हेच दाखवतंय,
म्हटलं बरोबर आहे तुझा लोकेशन इथेच आहे फक्त मध्ये जो हजार फुटांचा सह्याद्री आहे ना त्याच्या पलीकडे आहे देवकुंड.
देवकुंडचे पहिल्यांदा नाव पहिल्यांदा कानावर आले ते असे ! नंतर देवकुंड, अंधारबनाविषयी सतत कानावर येत राहिले पण जाण्याचा योग अाला तो तिथे झालेल्या अपघातानंतर ...
अंधारबनातील पर्यटकांची गर्दी, अरुंद वाट

हे देवकुंड आणि ताम्हिणीच्या घाटातले अंधारबनचे ठिकाण म्हणजे सह्याद्री पर्वताच्या शिरपेचातला मानाचा तुरा ! ताम्हिणीचा घाट आणि आजूबाजूचा परिसराला अभयारण्याचा दर्जा मिळाल्यानंतर तर या भागाचे महत्त्व कैक पटींनी वाढले. पश्‍चिम घाटातील ताम्हिणीचा हा परिसर प्रसिद्ध आहे तो मुळशीच्या विस्तीर्ण पसरलेल्या जलाशयासाठी, तुफान कोसळणाऱ्या पावसासाठी, डोंगरकड्यावरुन थेट रस्त्यावर कोसळण्याऱ्या धबधब्यांच्या माळांसाठी आणि पावसाळ्यातील चार महिने कायम धुक्‍यात हरवलेल्या रानवाटांसाठी.

साधारण दशकभरापुर्वीपर्यंत ताम्हिणी घाट हा निर्जन आणि सुनसान होता. संध्याकाळी सहानंतर या घाटातून वाहतूक सहसा टाळली जाई. अधूनमधून वाटमारीच्याही घटना या भागात घडत असत. कालांतराने जशा पर्यटनाच्या कक्षा रुंदावल्या तसतशी ताम्हिणीतील गर्दी वाढू लागली. आधी खड्ड्यात असलेला रस्ता गुळगुळीत झाल्यावर मोठमोठाली हॉटेल्स इथे उभी राहिली आणि ताम्हिणीचा परिसर गजबजून गेला.
याच ताम्हिणी घाटातून कोकणात जाताना निवे गावानंतर एक बारीक वाट भांब्रुर्डामार्गे लोणावळ्याला जाते. पूर्वी हा रस्ता असा नव्हताच, घनदाट जंगलातून जाणाऱ्या या वाटेचा वापर केवळ गावकरी आणि किल्ले धुंडाळत फिरणारे डोंगरयात्री करायचे. पण पुन्हा जसे पर्यटन वाढले तसे नवीन जागा शोधण्याच्या नादात या वाटेचा वापर सर्रास सुरू झाला. रस्ता कच्चा होता तो डांबरी झाला तशी वर्दळ वाढली.
हा रस्ता घनगड, कैलासगड, तैलबैला , भांबुर्डा असा फिरत लोणावळ्याला पोचतो. याच मार्गावर पिंप्री गावाच्या अलीकडून एक रस्ता खाली कोकणातल्या भिरा डॅमकडे उतरतो. हा संबंध रस्ता घनदाट जंगलातून जातो. हे जंगलातील झाडी इतकी घनदाट आहे की भर दिवसासुद्धा सूर्याची किरणे जमिनीवर पोचत नाहीत त्यामुळे इथल्या वाटांवर दिवसासुद्धा अंधार पसरलेला असतो. कदाचित यामुळे हा भाग अंधारबन म्हणून ओळखला जाऊ लागला. हे नाव कधी आणि कोणी दिले याची कागदोपत्री काही नोंद नाही पण हेच नाव रूढ झाले. ज्याने कोणी सर्वप्रथम या जागेला अंधारबन म्हणून संबोधले त्याच्या कल्पकतेचा खचितच दाद द्यावी लागेल.
सह्याद्रीच्या खांद्यावर घनदाट अरण्यात वसलेल्या निसर्गरम्य अंधारबनाला सध्या गालबोट लागत आहे ते अपघातांचे. बेबंद आणि बेशिस्त पर्यटकांच्या झुंडी या ठिकाणी येऊन जो धुडगूस घालत आहेत त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी कायमचे बंद होण्याची भीती आहे. अर्थात त्यात नुकसान होणार डोंगरयात्रींचे.
अंधारबनाच्या जवळ 2017 मध्ये आत्तापर्यंत दोन मोठे अपघात झाले आहेत. पहिल्या अपघातात मुंबईहून आलेल्या तरुण तरुणींचा ग्रुप पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे कुंडलिका नदीत अडकला. ट्रेकिंगची कुठलीही तांत्रिक माहिती तसेच साधने सोबत नसल्याने अखेर तिथल्या पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना दोर लावून बाहेर काढले. येथे जीवित हानी नाही झाली आणि मोठी दुर्घटना टळली. दुसऱ्या अपघातात 22 जुलैला पिंप्री गावातून अंधारबनात तीन तरुण ट्रेकिंगला म्हणून गेले आणि वाटेतल्या बोकड्या नाल्याच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात थेट खालच्या दरीत वाहून गेले. याच अंधारबनात पिंप्री गावचाच एक गावकरी या बोकड्या नाल्यातून गतवर्षीच्या पावसाळ्यातून वाहून गेला होता अशीही माहिती तिथल्या गावकऱ्यांनी दिली. गाव छोटे असल्यामुळे बाहेरच्या जगात हा अपघात पोहचू शकला नाही. या अपघातानंतर भिरा गाव तसेच देवकुंडचा भाग पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. भिरा गाव आणि देवकुंडचा भाग रायगड जिल्ह्यात येतो आणि अंधारबनाचा भाग पुणे जिल्ह्यात. अंधारबनातून भिरा गावात जायला घाटवाट असल्याने पर्यायाने हा मार्ग सुरूच राहिला आणि देवकुंडची गर्दी अंधारबनाकडे वळू लागली आहे.
'"अंधारबनला धोका आहे'', 'हा भाग धोकादायक आहे जाऊ नका', असे संदेश सोशल मिडीयावर फिरायला लागले त्यामुळे आपसूकच या जागेबद्दल थोडे कुतूहल निर्माण झाले. हा जागा नक्की का बदनाम होत आहे हे प्रत्यक्ष जाऊन बघण्यासाठी अंधारबनला जाऊन धडकलो. अंधारबनाचे नाव गेल्या दोन वर्षापासून ऐकून होतो. तेव्हा इथे जाऊन काही निरीक्षणे नोंदवायची, इथे येणारे पर्यटक नक्की काय करतात आणि स्थानिक गावकऱ्यांशी बोलून अंधारबनात नक्की काय धोका आहे हे जाणून घ्यायचा प्राथमिक हेतू होता.
त्यानुसार सकाळी सातलाच पिंप्री गावात पोचलो. अंधारबनाचा रस्ता हा पिंप्री गावाच्या अलीकडूनच अंधारबनात जातो. तसा बोर्ड तिथे लावला आहे. गावामध्ये दोन 60 सीटर बस आधीच येऊन पोचल्या होत्या. बाकीच्या वाहनांची संख्या धरून हा आकडा वीसाच्या घरात होता. (थोडक्‍यात 200 ते 300 पर्यटक सकाळीच तिथे जमले होते) नंतर दुपारपर्यंत हा आकडा अजून वाढत गेला.
पिंप्री गावात सकाळीच डेरेदाखल झालेल्या मोठमोठ्या बस , त्यातून उतरणाऱ्या "त्रेक्केर्स"च्या झुंडी निसर्गावर तुटून पडत होत्या.

अंधारबनाचाच ट्रेक प्रसिद्ध का ?

अंधारबनचे ठिकाण हे पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणांवरून जवळ आहे. सुट्टीच्या एका दिवसात हे ठिकाण सहज बघून होते. तसेच कोकणात पायथ्याला असलेले भिरा आणि देशावर माथ्यावर वसलेल्या पिंप्री गावापर्यंत अतिशय उत्तम रस्ता असल्याने मोठ मोठी वाहने अगदी सहज दोन्ही ठिकाणी पोहचू शकतात. हा ट्रेक करण्यासाठी पर्यटक, ट्रेक ग्रुप पिंप्री गावापर्यंत गाडीने पोचतात आणि तिथे गाडी त्यांना सोडून खालच्या भिरा गावात जाते. मधल्या वेळेत घाटवाटेने हे पर्यटक अंधारबनातून पावसाचा, धुक्‍याचा, जंगलाचा सुखद अनुभव घेत सात ते आठ किलोमीटरचे अंतर चालत भिरा गावात उतरतात. खाली भिरा गावात गाड्या येऊन पोचलेल्या असतात. थोडक्‍यात घाटवाटांची फिरस्ती करण्यासाठी जी तंगडतोड करावी लागते ती इथे करावी लागत नाही. तसेच घाट केवळ उतरून जायचा असल्याने चढाईचे कष्टही वाचतात. त्यामुळे या ट्रेकची काठिण्य पातळी पर्यायाने कमी होते व हौशी पर्यटकांची संख्या बेसुमार वाढत आहे.
--------------------------------------------------------
काही वर्षापूर्वी जगाच्या खिजगणतीत नसलेले या गावात आता टुमदार हॉटेल उभी राहिली आहेत,  ज्या निसर्गाच्या जीवावर रोजगार मिळतो आहे त्याचे रक्षण करण्याची जवाबदारी हि सर्वप्रथम त्यांचीच आहे.

पुणे पिंप्री अंतर - 68 किलोमीटर

मुंबई पिंप्री (लोणावळामार्गे) अंतर - 131 किलोमीटर
पुणे भिरा अंतर - 104 किलोमीटर
मुंबई भिरा अंतर - 125 किलोमीटर
पिंप्री ते भिरा अंतर - 36 किलोमीटर
--------------------------------------------------------
पिंप्री गावातून दिसणारा डोंगर डाव्या बाजूला ठेवत ,भातशेताच्या बांधावरून रस्ता अंधारबनाकडे जातो. डाव्या हाताला पसरलेले हिरवे विस्तीर्ण पठार आणि पठारावरून खाली पसरलेली कुंडलिकाची दरी सह्याद्रीच्या दुर्गम दऱ्याखोऱ्यांची चुणूक दाखवते. इथून रुळलेल्या पायवाटेवरुन रस्ता अंधारबनात जातो. इथली पायवाट रुळलेली असल्यामुळे या पायवाटेवर चुकण्याची शक्‍यता तशी कमी आहे. इथून पुढे जाताना वाटेच सात ते आठ छोटे मोठे ओढे लागतात. एका बाजूला असलेल्या कातळकड्यांवरुन कोसळणारे हे ओढे थेट दुसऱ्या बाजूच्या दरीत कोसळत होते. मधून जाणारी वाट जीवघेणी जरी नसली तरी तो भाग काळजीपूर्वक भाग करणे गरजेचे आहे. इथून पुढे गेला दोन मुख्य ओढे लागतात. जे तुम्हाली पार करावेच लागतात. पहिला ओढा लागतो तो 'माकड्या' आणि दुसरा ओढा लागतो 'बोकड्या'. 'माकड्या'चा नाला 'बोकड्या'पेक्षा अरुंद आहे. तसेच या ओढाच्या पात्रात आधारासाठी मोठ्या प्रस्तर शिळा आहेत त्यामुळे हा ओढा पार करणे सोपे जाते. तरीही पावसात काळजी घेणे आणि सोबत दोरखंडाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा माकड्याच्या नाल्यात तीन स्थानिक गावकरी या नाल्याची दुरुस्ती करत होते. नाला पार करायला सोपे जावे म्हणून तिथल्या मोठमोठाल्या शिळा ते हलवत होते. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय आणि कोणतीही अपेक्षा न करता गावकरी हे काम करत होते.
माकड्या नाल्याची दुरुस्ती करणारे ग्रामस्था, हि दुरुस्ती कोणासाठी तर तिथे येणाऱ्या पर्यटकांसाठी

इथून पुढे काहीच अंतरावर लागतो तो बोकड्याचा नाला. हा नाला दोन भागात विभागला गेलेला आहे. या नाल्याच्या बरोबर मधे एक उंचवटा आहे त्यामुळे नाल्याच्या एका बाजूला उभे राहिल्यास बोकड्या नाल्याची दुसरी बाजू दिसत नाही.

डोंगरातून उतरणारी पायवाट थेट पहिल्या भागात उतरते. हा भाग रुंद आहे तसेच इथे पाण्याला प्रचंड ओढ आणि थेट दरीत उतरणारा उतार आहे. याशिवाय सगळ्यात धोकादायक म्हणजे या सर्व भागातल्या खडकांवर उगवलेले शेवाळे हमखास जीवघेणे ठरू शकते. याच ओढ्यातून 22 जुलै रोजी फिरायला आलेले दोन तरुण वाहून गेले ते याच शेवाळ्याच्या निसरड्या वाटेवरून.
याच ओढ्‌याच्या वरच्या बाजूला स्थानिकांना त्यांच्या सोयीसाठी मोठ्या आकाराच्या लोखंडी तारा आधारासाठी पाण्यात बांधून ठेवल्या आहेत.
याच ओढा पार करताना जास्तीत जास्त अपघात झाले आहेत. म्हणून या बोकड्याच्या नाल्यावर येणाऱ्या पर्यटकांशी बोलून काही निरीक्षणे नोंदवण्यात आली. इथून खाली जाणारा रस्ता हिरडी गावामार्गे भिरा गावात उतरतो आणि ट्रेक संपतो. पिंप्री गावात सोडून गेलेल्या गाड्या तुम्हाला घ्यायला भिरा गावात हाजिर असतात. अंधारबनात जी निरीक्षणे नोंदवली गेली ती केवळ प्रातिनिधिक उदाहरण असून सह्याद्रीमधल्या बऱ्याच ठिकाणी फिरताना ट्रेकिंगच्या नावाखाली जे फिरणे बोकाळलं आहे तिथे याच गोष्टी थोड्या फार फरकाने सारख्याच पद्धतीने आढळून येतात.


दोन बाजूनी खाली दरीत उतरणारा बोकड्या नाला, पाऊस वाढल्यावर अवघ्या काही तासात इथल्या पाण्याची पातळी काही फुटांनी वाढते.

या ठिकाणी नोंदवण्यात आलेली निरीक्षणे

- ज्या ठिकाणी आपण ट्रेकला जाणार आहोत त्या भागाची भौगोलिक माहिती, तिथे झालेल्या अपघातांचा इतिहास याची पुरेशी माहिती या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना नव्हती. बरेचसे पर्यटक हे बाहेरच्या राज्यातील होते. त्यांना सह्याद्रीची भौगोलिक रचना, या भागाचे पर्यावरण, दुर्गमता, इथे होणारी अतिवृष्टी, स्थानिक भाषा याबद्दल काडीचीही कल्पना नव्हती.
- अशा ठिकाणी जाताना ट्रेकिंगसाठी म्हणून वापरली जाणाऱ्या अगदी मूलभूत गोष्टींचा वापर इथे आलेल्या पर्यटकांकडून केला जात नव्हता. उदाहरणार्थ ट्रेकिंगचे आणि उत्तम ग्रीप असणारे शूज, हॅवर सॅक, कपडे या गोष्टींकडे कानाडोळा केला जात होता. ट्रेक लिडरसुद्धा या गोष्टींना फारसे महत्त्व देत नव्हते.
- पावसाळ्यात अशा प्रकारचे ओढे पार करताना कमीत कमी पन्नास एक फुटाचा रोप जवळ बाळगावा. मात्र येथे येणाऱ्या बहुसंख्य ग्रुपकडे दोर नव्हता. तसेच वर सांगितल्याप्रमाणे हा नाला पार करण्यासाठी ज्या ठिकाणी लोखंडी तार गावकऱ्यांनी लावली आहे त्याचाही वापर कोणीही केला नाही.
- ओढा पार करताना पाण्याचा अंदाज घेऊन मानवी साखळी करून ओढा पार करावा. मात्र हे तांत्रिक ज्ञान नसल्याने बरेच जण घोळक्‍यात हा नाला पार करत होते.
- ज्या ओढ्यात दोन तरुणांचा जीव गेला त्याच ओढ्यात, त्याच उतारावर बहुसंख्य पर्यटकांचा सेल्फी घेण्याचा सामुदायिक कार्यक्रम चालू होता. या प्रकारच्या गडबडीत बरेच पर्यटक त्याच ठिकाणी घसरून पडत होते जे कुठल्याही क्षणी जीवघेणे ठरू शकले असते.
- इथे आलेल्या अनेक ट्रेक लिडरशी बोलल्यानंतर असे कळले की त्यांच्यापैकी कोणीही इथे येण्याआधी त्या दिवशीच्या हवामान खात्याच्या अंदाजांची माहिती घेतली नव्हती. तसेच बऱ्याच ट्रेकिंग संस्था हे पूर्ण पावसाळ्यातील ट्रेकचे नियोजन जून महिन्यातच करतात. त्यामुळे ट्रेक ज्या दिवशी जाणार नेमका त्यादिवशीचे हवामान आणि पावसाचा अंदाज घेण्याची तसदी या ट्रेक लीडरनी घेतलेली नव्हती.
- काही ट्रेक ग्रुप हे 70 ते 80 लोकांचे होते. प्रमाणापेक्षा जास्त सदस्य एकाच ग्रुपमध्ये कोंबल्यामुळे सर्वांवर लक्ष्य ठेवणे अशक्‍य होते. त्यामुळे काही लोक मागे रेंगाळत होते. रस्ता चुकत होते. धोकादायक पद्धतीने ओढा ओलांडत होते.
- अंधारबनाविषयीची सकारात्मक गोष्ट म्हणजे या भागात पर्यटकांची इतकी गर्दी होऊन सुद्धा या मार्गावरती कचऱ्याचे प्रमाण आश्‍चर्यकारकरीत्या कमी होते.
- या नाल्याचा पूर्ण भाग अत्यंत निसरडा होता आणि प्रचंड शेवाळे या भागात साठले होते. साठलेले शेवाळे हेच या भागात जीवघेणे ठरत आहे.
- या अपघात प्रवण भागात धोक्‍याची सूचना देणारी एकही पाटी किंवा खूण तेथे नाही.
- बऱ्याचदा गुगल मॅपवर माहिती घेऊन असे ट्रेक हौशी तरुणांच्या ग्रुपकडून आखले जातात. या भागात धोके,रस्ते, पाण्याची उपलब्धता याची माहिती घेतली जात नाही. तसेच गावातल्या स्थानिकांना माहिती न देता हे पर्यटक परस्पर जातात.
 बोकड्या नाला घोळक्यात ओलांडणारे पर्यटक, याच जागी दोन पर्यटक वाहून गेले.

शिवदुर्गची मदत

ज्या बोकड्या नाल्यातून हे दोन तरुण वाहून दरीत गेले. तो दरीचा भाग लोणावळ्याच्या शिवदुर्ग संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पिंजून काढला. यानिमित्ताने या संस्थेचे सचिव सचिन गायकवाड यांच्याशी त्यांना ही रेस्क्‍यू मोहीम कशी राबवली याची माहिती घेतली. सचिन गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 'ज्या ठिकाणाहून ही दोन मुले वाहून गेली ती रस्ता चुकून दरीकडे जात असताना खाली कोसळली. त्यांच्याकडे दोर किंवा तत्सम साहित्य नव्हते. तसेच दोन जणांपैकी एक जण आधी कोसळला आणि त्याला वाचविण्याच्या नादात दुसराही खाली दरीत कोसळला. हा अपघात होत असताना पुण्यातला एक ग्रुप तेथे आलेला होता आणि त्यांच्यासमोर हा अपघात घडला. या ग्रुपमधल्या एकाने शिवदुर्गला कॉल करून ही माहिती दिली पण हा ग्रुप केवळ माहिती देऊन तिथून निघून गेला बाकी पोलिसांना किंवा गावकऱ्यांना ही माहिती देण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. बोकडया नाला जिथून खाली कोसळतो तिथे दोन टप्प्यात खोल आणि अरुंद दरी आहे. पहिला टप्पा जवळपास चारशे फुटाचा असून दुसरा टप्पा साडेतीनशे ते चारशे फुटाचा आहे.
या भागाच्या दुर्गमतेमुळे येथे NDRFची टीम शोध मोहीम राबवू शकली नाही. त्यामुळे शोध मोहिमेसाठी हा धबधब्याचा भाग आणि खालचे नदीचे पात्र हा भाग शिवदुर्गच्या कार्यकर्यांना आखून देण्यात आला होता. जिथून धबधबा पहिल्या टप्प्यात कोसळतो तिथे एक डोह तयार झालेला आहे. बऱ्याचदा वरून पडलेल्या गोष्टी या डोहातच अडकून राहतात. मात्र या वेळेस पाण्याचा प्रवाह वेगवान असल्यामुळे हा मृतदेह अजून खाली वाहून गेला. त्यामुळे हा भाग पिंजून काढूनसुद्धा या भागात मृतदेह सापडले नाहीत. नंतर पुढच्या टप्प्यात दरीतील नदी पात्रात 'विजेची शिळा' नावाचा एक प्रचंड आकाराची प्रस्तरशिळा आहे. त्याच्या कपारीत देखील शोध घेण्यात आला. हा भागात शोध घेताना सात ठिकाणी पाण्याचे वेगवान प्रवाह ओलांडावे लागले. अखेरीस पहिला मृतदेह धबधब्यापासून आठ ते दहा किलोमीटर लांब नदीच्या काठाला आढळून आला. दुसरा मृतदेह तिथल्या स्थानिक आदिवासींना सापडला. या आधी देवकुंडलाही अपघात झाले होते. या एकूणच सगळ्या प्रकारांमुळे देवकुंडचा धबधबा तर पर्यटकांसाठी बंदच करण्यात आला आहे.
------------------------------------




Comments

Popular posts from this blog

कासवांचे गाव

रतनगड ते हरिश्‍चंद्रगड कात्राबाईच्या साक्षीने....

मेंगाईसोबतची रात्र